शिवाजी पार्कच्या मधुकर ब. राऊत रस्त्यावरचं ते शांत टुमदार बंगलीवजा घर... तशी अनेक घरं शिवाजी पार्कमध्ये विखुरलेली होती. पण या घराचं महत्त्व विशेष. शिवाजी पार्कात फिरायला येणारे हमखास वाट वाकडी करून या घरासमोर यायचे आणि टाचा उंच करून कंपाऊंडमधून आत डोकावून पाहायचे. घरात तशी सामसूमच असायची , तरी त्या घराबद्दलचं औत्सुक्य मात्र कायम होतं... १९६६ पर्यंत हे असंच होतं. या घराबाहेर संगमरवरात कोरलेली पाटी होती- सावरकर सदन.
कोरलेल्या नावातही या घराचं वेगळेपण दिसत होतं. त्यातल्या ' सावरकर ' शब्दातले दोन्ही ' र ' खास सावरकरी देवनागरी लिपीत होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे मुंबईतलं राहतं घर. आयुष्यातली अखेरची तब्बल 28 वर्षे या स्वातंत्र्यवीराचा मुक्काम याच वास्तूत होता. सावरकरांचा कामाचा व्याप दांडगा. त्यांचं नावही भारतभर अनेकांच्या तोंडी. त्यामुळे माणसांचा पसारा मोठा. तरीही ' सावरकर सदन ' ही ' सार्वजनिक इमारत ' बनली नाही. ते सावरकर कुटुंबाचं खाजगी घरच राहिलं.
एकेकाळी एक मजली असणा-या बैठ्या घराच्या जागी आता पाच मजली इमारत उभी आहे. मूळ घराची वास्तू तशीच आहे , पण बाजूला लिफ्ट आली आणि वर मजले उठले. ही वास्तू वीर सावरकरांच्या मालकीची होती. पुढे ती त्यांच्या मुलांकडे गेली. आता तिची ' सोसायटी ' बनली आहे. इथे सावरकर राहायचे , असं आता नव्या पिढीला सांगावं लागतं. कारण इतका मोठा क्रांतिकारक इथं राहायचा , हे इथल्या गल्लीतल्या मुलांनाही फारसं माहीत नाही. सावरकरांचे पुत्र विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी आता या घरात राहतात. त्यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसल्याने घरातला माणसांचा ओढाही आटत गेला. आता ' सावरकर इथं राहायचे ', या इतिहासाखेरीज इथं काही उरलं नाही. सावरकरांची पुस्तकं , काही वस्तू , त्यांना भेटीदाखल मिळालेली तलवार , काही मानपत्रं ,कपडे अशा गोष्टींचं छोटंसं म्युझियम आहे. पण ते ' खासगी ' स्वरुपाचंच.
' सावरकर सदन ' हे स्वत: सावरकरांनी हौसेनं उभं केलेलं घर. ही गोष्ट १९३८ सालची. सावरकर नुकतेच रत्नागिरीतून कायमच्या वास्तव्यासाठी मुंबईत आले होते. सुरुवातीला ते जवळच्याच ' भास्कर भुवन ' मध्ये सहकुटुंब राहिले. त्या काळात शिवाजी पार्काच्या परिसरात टुमदार घरे बांधली जात होती. मराठीतले नामवंत कलावंत , लेखक आणि राजकारणी या परिसरात राहायला येऊ लागले होते. तिथंच सावरकरांनी आपलं घर बांधायचं ठरवलं आणि ३८ च्या जूनमध्ये सावरकर कुटुंब या वास्तूत राहायला आलं. त्यांच्या कुटुंबात चारच माणसं. ते स्वत: , त्यांच्या पत्नी माई , मुलगा विश्वास आणि कन्या प्रभात. हे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहायचं. तळमजल्यावर त्यांचे मोठे बंधू बाबाराव आणि अन्य परिवार होता.
तळ मजल्यावरच्या दर्शनी मोठ्या दिवाणखान्यात सावरकरांचा वावर असायचा. येणारी-जाणारी माणसं त्यांना तिथंच भेटायची. अन्य वेळी विशिष्ट पद्धतीचं धोतर नेसलेले सावरकर तिथंच आरामखुर्चीत बसून वाचन करताना दिसायचे. ते परिसरात फारसे फिरायचे नाहीत. जेव्हा फिरायचे , तेव्हा एकटेच , क्वचित कधी नात विदुला आणि तिचे शाळकरी सोबती मागं-पुढं धावायचे , तितकेच.
या घराच्या अनेक आठवणी विश्वासराव आजही विस्तारानं सांगतात. विविध क्षेत्रातली मोठी माणसं सावरकरांना भेटायला आवर्जून इथं यायची. मग तास न् तास चर्चा चालायच्या नि गप्पा रंगायच्या. भाई परमानंद आल्याचं विश्वासरावांना स्मरतं आणि मास्टर तारासिंगही येऊन गेल्याचं ते सांगतात. आचार्य अत्रे यायचे , तसंच सुमती गुप्ते, राजा बढे , लता मंगेशकरही येऊन जायच्या. ह.रा. महाजनी , विद्याधर गोखले , पां.वा. गाडगीळ या पत्रकारांचीही वर्दळ असायची.
पण विश्वासरावांना विशेष करून आठवते , ती नेताजी सुभाषचंद बोस यांची याच वास्तूत झालेली सावरकरांशी प्रदीर्घ चर्चा. आझाद हिंद फौजेच्या स्थापनेविषयीची ती बैठक होती. त्यानंतर नेताजींच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली आणि देशाच्या इतिहासाची चौकटही बदलली. अशा एक ना अनेक आठवणी.
वीर सावरकरांनी आत्मार्पण केल्याला ३७ वर्षं उलटली. आता ' सावरकर सदन ' केवळ एक आठवणीतलं घर उरलं. पण त्या घरातल्या क्रांतिकारकाच्या वास्तव्याचा सुगंध आजही साऱ्या परिसराला सुगंधित आणि पुलकित करतो.
-भ्रमरछंदी

No comments:
Post a Comment