वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...
फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..
शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...
गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...
अश्या सुंदर नवथर वेळी
दवओल्या गवतावरून तेव्हा
अलगद माझ्या सखयाने यावे
ओळखीने हसत मंदसे
हात माझे हाती घ्यावे...
नजरेच्या गारुडात त्याच्या
देहभान मी विसरुन जावे
अस्तित्व माझे संपून जावे
तरीही भोवतीचे हे सारे
जीवन पुढे निघून जावे...
-गिरिश देशमुख

No comments:
Post a Comment