मूळ हेतूचं काय झालं?

शेषराव मोरे 


धम्मस्वीकारामुळे एवढा मोठा दलित समाज बुद्धिवादी , जातिमुक्त , समतावादी झाला काय ? हिंदू धर्माच्या मानसिकतेतून तो मुक्त झाला काय ? विशेष म्हणजे त्यांनी धम्मस्वीकार केल्यामुळं इतर समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा पूवीर्चा दृष्टिकोन बदलला काय ? या प्रश्ानंचे उत्तर ' होय ' देण्याचं धाडस बौद्धधम्मीयही करू शकणार नाहीत , असं प्रतिपादन करताहेत ज्येष्ठ विचारवंत... 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली धर्मांतर वा बौद्धधर्मस्वीकार केला नसून बौद्धधम्मस्वीकार केला , असे बौद्धधम्मीय आग्रहपूर्वक सांगत असतात. ' धर्म ' ( क्रद्गद्यद्बद्दद्बश्ाठ्ठ) व 'धम्म ' ( ष्ठद्धड्डद्वद्वड्ड) यांतील फरक डॉ. आंबेडकरांनीच आपल्या ' भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ' ग्रंथामध्ये स्पष्ट करून सांगितलेला आहे. त्याच्या तपशिलात येथे जाता येणार नाही. येथे एवढेच सांगणे पुरेसे आहे की , त्यांच्या दृष्टीने ' धर्म ' ही एक पारलौकिक संकल्पना आहे ; तर ' धम्म ' ही मानवी मूल्यांवर आधारित माणसांचे परस्परसंबंध ठरविणारी नैतिक जीवनपद्धती आहे. ग्रंथात एके ठिकाणी तर त्यांनी ' धम्म म्हणजे नीती ' व ' नीती म्हणजे धम्म ' असे समीकरणच मांडले आहे. ' बौद्धधर्मा ' ऐवजी ' बौद्धधम्म ' असा शब्दप्रयोग करण्याचा आग्रह त्यांनी त्या ग्रंथातच धरला आहे. 

' बौद्धधम्म ' म्हणून त्यांना काय अभिप्रेत होते हे सांगण्यासाठी त्यांनी ६०० पृष्ठांचा तो ग्रंथच आयुष्याच्या शेवटी लिहिला व त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने तो प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी प्रचलित बौद्धधर्म जशाचा तसा स्वीकारला नसून तो संस्कारित करून स्वीकारला आहे. या ग्रंथात आपण बुद्धाचे मूळ तत्त्वज्ञानच मांडीत आहोत , असा त्यांचा दावा आहे. त्यांचे म्हणणे असे की , बुद्धाची मूळ शिकवण , नंतर त्यांचे अनुयायी बनलेल्या ब्राह्माणांनी , विपर्यस्त करून मांडली आहे , की ज्यातून त्रिपिटक व जातककथांसारखे बौद्ध वाङ्मय निर्माण झाले. त्यातील शिकवण ही बुद्धाची मूळ शिकवण नव्हे. ती मूळ व खरी शिकवण शोधण्यासाठी त्यांनी तीन कसोट्यांचा उपयोग केला आहे. त्या कसोट्या अशा : एक - जे जे बुद्धीला व तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे , म्हणून त्यात जेवढे बुद्धिनिष्ठ व तर्कनिष्ठ असेल , तेवढेच बुद्धाचे वचन म्हणून स्वीकारावे. दोन , जे जे मनुष्यकल्याणास पोषक नाही , ते ते बुद्धाचे नव्हे! म्हणून जे असे नाही तेे बुद्धशिकवण म्हणून स्वीकारता येत नाही. तीन , जे वस्तुनिष्ठ आहे , निश्चित प्रत्ययास येते त्याविषयीच बुद्ध बोलतात , जे सिद्ध झाले नाही अशा (ईश्वर , स्वर्ग , आत्मा) इ. गोष्टींबद्दल ते काहीच संागत नाहीत. तेव्हा , अशा काल्पनिक गोष्टींविषयी बौद्धग्रंथांत जे सांगितलेले आहे , ते बुद्धाचे नाही असे समजायचे. 

या तीन कसोट्या वापरून त्यांनी प्रचलित बौद्ध वाङ्मयातून आपला ग्रंथ सिद्ध केला. थोडक्यात , त्यांच्या आधुनिक बुद्धीला विसाव्या शतकात जे पटले होते , योग्य व हितकारक वाटले होते ,ते त्यांनी बौद्ध वाङ्मयाचे संदर्भ देत गौतम बुद्धाच्या नावे ' बौद्धधम्म ' म्हणून आपल्या ग्रंथात मांडले. त्यामुळे त्या वेळेस असे म्हटले गेले की , हा ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' नसून 'आंबेडकर आणि त्यांचा धम्म ' होय. ' महाबोधी ' या प्रसिद्ध बौद्धधमीर्य मासिकाने असे मत दिले की , ' हा भयंकर ग्रंथ आहे... हे बौद्ध धर्माचे शुद्ध विवरण नव्हे , ते नवीन आहे... राजकीय व सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी तो उपदेशिला आहे. ' स्वत: आंबेडकरांनीच धम्मदीक्षेच्या आदल्या दिवशी स्पष्ट केले होते की , ' माझा बौद्धधम्म म्हणजे एक प्रकारचा नवबौद्धधर्म किंवा नवायात आहे. ' 


बौद्धधर्मस्वीकाराच्या फलश्रुतीचा विचार करताना त्यांची वरील भूमिका लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्यांचा धम्मस्वीकाराचा उद्देश कोणता होता व तो कितपत साध्य झाला , हे जाणण्यासाठी हे आवश्यक आहे. 

त्यांचे मुख्य उद्देश असे होते- दलित समाजाला हिंदूधर्मातील चातुर्र्वण्याच्या व जातिसंस्थेच्या आपत्तीतून मुक्त करणे ; त्यांच्यातीलही जाती व जातिभेद नष्ट करून त्यांना जातिमुक्त बनविणे, त्यांच्यात समता प्रस्थापित करणे , त्यांच्यात अस्मिता व स्वाभिमान निर्माण करणे , आपल्या सत्वासाठी संघर्ष करण्यास तयार करणे , त्यांना ईश्वर , अंधश्रद्धा , पोथीनिष्ठा , कर्मकांडे ,दैववाद इत्यादी बुद्धिबाह्य गोष्टींपासून मुक्त करून बुद्धिवादी व विवेकवादी बनविणे , त्यांच्यात मानवी मूल्यांची प्रस्थापना करणे , इत्यादी. केवळ दलितांनाच नव्हे तर , संपूर्ण हिंदुसमाजालाच बौद्धधम्मीय बनविण्याची त्यांची महत्त्वांकाक्षा होती. सर्व भारत मी बौद्धमय बनवीन , असे ते म्हणत असत. 

या पार्श्वभूमीवर धम्मस्वीकाराची फलश्रुती काय , याचा विचार करावा लागतो. धम्मस्वीकारामुळे तो समाज बुद्धिवादी , जातिमुक्त , समतावादी झाला काय ? हिंदू धर्माच्या मानसिकतेतून तो मुक्त झाला काय ? विशेष म्हणजे त्यांनी धम्मस्वीकार केल्यामुळे इतर समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा पूवीर्चा दृष्टिकोन बदलला काय ? 

या प्रश्ानंचे उत्तर ' होय ' देण्याचे धाडस बौद्धधम्मीयही करू शकणार नाहीत. हे सहजपणे दाखवून देता येते की , धम्मस्वीकारानंतरही व त्यास ५० वर्षं होऊन गेल्यावरही व आता नवी पिढी आल्यावरही त्यांच्यातील जातिभेदाची जाणीव सामान्यत: तशीच शिल्लक आहे. आंबेडकरांच्या दृष्टीतून तरी जातिमुक्त समाज हा उद्देश सर्वाधिक महत्त्वाचा होता. त्यांची अपेक्षा किमान सर्व दलितांनी तरी धम्मस्वीकार करावा अशी होती. पण तसे घडले नाही. प्रामुख्याने धम्मस्वीकार हा महाराष्ट्रापुरता व त्यातही महार जातीपुरता मर्यादित राहिला , हे उघड सत्य आहे. ढोर , चांभार , मांग या प्रमुख जातींनी धम्मस्वीकार केला नाही. आंबेडकरांच्या काळातच या जाती त्यांच्यापासून दूर गेल्या होत्या. जे धर्मत्यागास पाठिंबा देणार नाहीत , त्यांना १९३७च्या निवडणुकीत आपल्या स्वतंत्र मजूर पक्षातफेर् तिकिटे देण्यास त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे चांभार जातीच्या कोणालाही तिकीट मिळाले नव्हते. धर्मांतर व राजकारण याची आंबेडकरांनीच सांगड घातलेली होती. महारेतर जाती काँग्रेसकडे गेल्या होत्या. त्या धर्मांतर करणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. परिणामत: धम्मस्वीकार हा महार जातीपुरताच मर्यादित राहिला. शेवटी राजकारण , समाजकारण व धम्मस्वीकार परस्परात गुंतले गेले. महाराष्ट्रात तरी बौद्धधम्मीय म्हणजे नवबौद्ध व महार ही पर्यायी नावे ठरली. रिपब्लिकन पक्षाचा जो असतो तो बौद्धधम्मीय असतो , असे मानले गेले. 

बौद्धधम्मस्वीकारानंतरही ते जातिमुक्त झाले नाहीत. उलट पूवीर्प्रमाणेच आपापल्या जातीचा ते अभिमान मानू लागल्याचे दिसून येते. आपल्या जातीची काही गुणवैशिष्ट्ये आहेत , असे हिंदूंतील प्रत्येक जातीला वाटत असते. बौद्धधम्मीय हे यास अपवाद ठरले नाहीत. एवढेच नाही तर , आंबेडकरांच्या लेखनातूनही हे दाखवून देता येते की , महार जातीच्या काही स्वाभाविक गुणवैशिष्ट्यांची त्यांना जाणीव होती. शौर्य व प्रामाणिकपणा हे त्यांपैकी होत. थोडक्यात , धम्मस्वीकाराचा जातिमुक्तीचा उद्देश कितीही उदात्त असला तरी तो प्रत्यक्षात उतरलेला दिसत नाही. 

एवढेच नाही तर , बौद्धधम्मीय होऊनही आपल्या पोटजातीचा ते त्याग करू शकले नाहीत. त्यांच्यातील लेखकांनीच लिहून ठेवले आहे की , बौद्धधम्मीयांतही पोटजातींची पाळेमुळे अद्यापही पक्की रूजलेली आहेत. बेटीबंदी व आपल्या पोटजातीचा अभिमान अद्यापही चालूच आहे. आपल्या पोटजातींची वैशिष्ट्ये ते टिकवून आहेत. त्यांनी असेही नोंदवून ठेवले आहे की , हा पोटजातिवाद केवळ अशिक्षितांत नव्हे तर सुशिक्षितांत व दलित लेखकांतही जिवंत आहे. त्यांची साहित्य संमेलने , परिषदा भरवितानाही याचा विचार केला जातो. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य न होण्याचे एक कारण त्यांच्या नेत्यांत असलेला हा पोटजातीवाद आहे , असे सर्रास म्हटले जाते. ना. म. शिंदे यांचे ' जातीला जात वैरी ' ( पॉप्युलर , १९९०) हे पुस्तक या विषयावर भरपूर प्रकाश टाकणारे आहे. 

त्यांनी धम्मस्वीकार केला असला , तरी व गौतम बुद्ध हे क्षत्रिय असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा हिंदुसमाजाचा जातीय दृष्टिकोन या कारणाने फारसा बदललेला नाही. हे येथे लक्षात घेतले पाहिजे की , बेटीबंदी व जातीय मानसिकता याशिवायच्या रोटीबंदी , व्यवसायबंदी , स्पृश्यबंदी , जातीवरून गुणवत्ता ठरविण्याची पद्धत इत्यादी जातिसंस्थेच्या बाबी आज सर्वच हिंदुसमाजात नष्ट झालेल्या आहेत ; पण त्याचे कारण बौद्धधम्मस्वीकार नसून एकूण समाजप्रबोधन व सामाजिक कायद्यामुळे झालेले ते परिवर्तन आहे. 

हीच गोष्ट अंधश्रद्धा , कर्मकांडे , पोथीनिष्ठा इत्यादीसंबंधात लागू आहे. एखाद्याने धम्मस्वीकार केला नि तो बुद्धिवादी झाला असे घडले नाही ; घडणे शक्यही नव्हते. मनुष्य हा बुद्धीवर चालत नसून प्रामुख्याने श्रद्धेच्या आधारे जगत असतो. धर्मांतराने जुन्या श्रद्धा नष्ट झाल्या तरी त्या जागी नव्या श्रद्धा निर्माण होतात. एक प्रकारे धर्मांतर हे श्रद्धांतर ठरते. त्या धर्मांतराला धम्मस्वीकार म्हटल्याने फारसा फरक पडत नाही. कुठेतरी बुद्धिबाह्य श्रद्धा ठेवल्याशिवाय जगता येत नाही , ही मनुष्याची दुर्बलताच आहे. त्यामुळे धम्मस्वीकाराने अंधश्रद्धा नष्ट झाल्या नाहीत , यात विशेष काहीच नाही. आंबेडकरांना धर्माची गरज वाटतच होती. पण तो धर्म नीतिमूल्ये शिकविणारा असावा , असे त्यांना वाटे. कोणावर तरी श्रद्धा ठेवूनच त्या श्रद्धास्थानाच्या नावाने समाजाला नीतिमूल्यांची शिकवण देण्याची अपरिहार्यता त्यांना पटलेली होती. यासाठी त्यांना गौतम बुद्ध सापडला. एखादा बुद्धिवादी संघ स्थापून त्यांना हे करता आले नसते. तेव्हा त्यांचे धम्मस्वीकार हे श्रद्धांतरच ठरत होते. परिणामत: त्यामुळे काही प्रथा , रूढी , विधी , कर्मकांडे , पूजा , प्रार्थना या धम्माबरोबर येणार होत्या. राम व कृष्णाऐवजी त्यात बुद्ध (व नंतर त्याच्या जोडीला डॉ. आंबेडकर) आले , दीपप्रज्ज्वलन जाऊन मेणबत्ती आली. तेव्हा धर्म जाऊन धम्म आला तरी अंधश्रद्धेचे पूर्ण उच्चाटन होऊन समाज बुद्धिवादी काही झाला नाही. डॉ. आंबेडकरांनाही याची जाणीव होतीच. 


याचा अर्थ धम्मस्वीकाराने काहीच फलनिष्पत्ती झाली नाही , असे नव्हे. त्याचे मूल्यमापन वरील जातिमुक्ततेच्या , बुद्धिवादी व नीतिमान बनण्याच्या कसोटीने करता येणार नाही , एवढेच आमचे म्हणणे आहे. एका अर्थाने या गोष्टी धर्मांतराच्या कार्यक्षेत्रात येतच नाहीत. धम्मस्वीकाराचे याशिवायचे मानसिक व अन्य काही परिणाम मात्र महत्त्वाचे आहेत. 

धम्मस्वीकारामुळे अशी एक भावना त्यांच्यात निर्माण झाली की , आपण आता हिंदुधर्मात नाही , हिंदुसमाजाचा भाग राहिलो नाही , हिंदूही राहिलो नाही , जुने आता नष्ट झाले आहे ,आता नवे जीवन जगायचे आहे , आम्ही आता स्वतंत्र आहोत , कोणाचे गुलाम नाही , आम्हीच आता आमचे भवितव्य घडविणार आहोत , अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार आहोत , माणूस म्हणून जगणार आहोत , ही भावना व प्रेरणा ही धम्मस्वीकाराची सर्वांत मोठी फलनिष्पत्ती आहे. या दृष्टीने नवी प्रेरणा , नवी उमेद , नवे ध्येय व नव्या जाणिवा घेऊन त्यांची वाटचाल चालू आहे. इतर कोणत्याही मागास जातीपेक्षा बौद्धधम्मीयांचा शैक्षणिक , आथिर्क , सामाजिक क्षेत्रांतील प्रगतीचा वेग अधिक आहे व त्याचे कारण ही भावना व प्रेरणा होय. 

बुद्धिवाद , अंधश्रद्धा , पोथीनिष्ठा इत्यादी बाबतीतही असेच घडले आहे. हिंदूधर्मातील अंधश्रद्धादी गोष्टींवर प्रहार करण्यात ते सर्वांत पुढे असल्यामुळे त्याचा एक परिणाम आपल्या धम्मातही या गोष्टी असू नयेत , आपण त्या पाळू नयेत या बाजूने ते होण्यात काही तरी झालेलाच आहे. दुसऱ्याच्या धर्मातील अंधश्रद्धेवर आपण टीका करतो ; मग आपण त्या कशा पाळायच्या या दृष्टीने ते निश्चितच विचार करीत असताना त्याचा काहीतरी परिणाम होतच असतो. त्यामुळे बुद्धिवादाकडे झुकण्याचा या समाजाचा कल इतर जातींपेक्षा अधिक असल्याचे प्रत्ययास येते. 

धम्मस्वीकाराची एक महत्त्वाची फलश्रुती म्हणजे बौद्धधम्मीय झालेल्यांच्या सर्व पोटजातींना एकत्रित व संघटित करण्यासाठी या धम्माच्या ध्वजाचा उपयोग झाला आहे. बौद्धधम्माचे नाव घेतले की , आपल्या पोटजातीच्या भावना विसरून सर्व एका ध्वजाखाली येतात. जातींचे नाव न घेता त्यांना एकत्र करण्यासाठी धम्माचे मिळालेले जातिविरहित व्यासपीठ ही फार मोठी उपलब्धी आहे. स्वत: आंबेडकरांना सर्व दलित जातींना एकत्रित करण्यासाठी धम्माच्या व्यासपीठाची आवश्यकता वाटत होती , हे दाखवून देता येते. अशा सर्व जाती नसल्या तरी महारांतील सर्व पोटजाती या ध्वजाखाली एकत्रित येऊ शकल्या. त्यांच्या राजकीय व्यासपीठावरही गौतम बुद्धाच्या प्रतिमा दिसू लागल्या , याचे कारण हेच होय की त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी धम्म-प्रतिमा उपयोगी पडली. या दृष्टीने पाहता धम्म व्यासपीठ हे एका दृष्टीने धामिर्क , दुसऱ्या दृष्टीने सामाजिक व तिसऱ्या दृष्टीने राजकीय व्यासपीठ ठरले आहे. धर्म ,समाजकारण व राजकारण यांचे एकत्रीकरण ही गोष्ट येथे घडली आहे. राजकीय व्यासपीठावर बुद्धाची प्रतिमा ठेवल्यास त्यास राजकारणातील धामिर्क हस्तक्षेप मानले जात नाही , ही गोष्ट येथे लक्षात घेण्यासारखी आहे. 

धम्मस्वीकाराचा एक परिणाम मात्र असा झाला की , हिंदूधर्मावर , हिंदूसमाजावर , त्यांच्या श्रद्धास्थानावर , इतिहासावर , परंपरेवर अगदी टोकाला जाऊन कठोर प्रहार करणे हे बौद्धधम्मीयांचे महत्त्वाचे धर्मकर्तव्य व कार्यच होऊन बसले आहे. जणू हिंदूसमाज आपला एकमेव शत्रू आहे , अशा पद्धतीने त्यांचे लिहिणे व बोलणे चालू असते. हिंदूसमाजात आज खूप परिवर्तन झाले आहे. कालचा सनातनी हिंदू आज राहिला नाही. तो ब्राह्माण असला तरी उघडपणे व्यासपीठावर दलित साहित्यिकाच्या वा विद्वानाच्या पाया पडू लागला आहे. अनेक गावात पोलिस पाटील वा सरपंच दलित जातीचे आहेत. दलितही राष्ट्रपती होऊ लागला आहे. परंतु या परिवर्तनाची दखल घ्यायला ते तयार नाहीत. या बदलाचे स्वागत करायला ते तयार नाहीत. जणू हिंदूसमाजाशी जुन्या गोष्टी काढून संघर्ष करीत राहणे त्यांच्याकरिता आवश्यक होऊन बसले आहे. दलित साहित्यात या बदलाचे प्रतिबिंब पडताना दिसत नाही. त्यांच्या कांदबऱ्यांतील वा नाटकांतील गुरुजी अजूनही दलित विद्यार्थ्याला दुरूनच छडी मारताना दिसतो आहे. अन्य दलित जातींपेक्षा बौद्धधम्मीय समाज हा हिंदूसमाजापासून अधिक दुराव्याने वागताना दिसतो आहे. त्यामुळे हिंदूसमाजाची सहानुभूतीही त्यांच्यापेक्षा अन्य दलित जातींप्रती अधिक आहे. सामाजिक एकात्मता व समाजसुधारणेच्या दृष्टींनी हा दुरावा वा संघर्ष यापुढे हितकारक ठरणारा नाही. ज्या प्रमाणात हिंदूसमाज बदलत आहे , त्याप्रमाणात बौद्धधम्मीयांनीही आपल्या या धोरणात बदल करण्याची गरज आहे. आपण एकाच समाजाचे व राष्ट्राचे घटक आहोत हे लक्षात घेऊन त्या दिशेने बौद्धधम्मस्वीकाराची अंतिम फलनिष्पत्ती होणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment